देशातील ३०० जिल्ह्यांत आज नागरी संरक्षण सराव   

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढता तणाव आणि युद्धसदृष्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशातील ३०० जिल्ह्यांत आज (बुधवारी) नागरी संरक्षण सराव (मॉकड्रिल) केले जाणार आहे. जेथे  आण्विक प्रकल्प, लष्करी ठाणी, शुद्धिकरण कारखाने आणि जलविद्युत प्रकल्प आहेत, अशा जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. 
 
एखाद्या युद्धजन्य परिस्थितीत ठराविक भागातील नागरिकांनी स्वत:चे संरक्षण आणि काळजी कशी घ्यायची याचे ते एक प्रकारचे प्रशिक्षण आहे.  एखादा हवाई हल्ला होण्याची शक्यता असेल तर धोक्याचा इशारा देणारे सायरन वाजवले जातील. तेव्हा नागरिकांनी काय करायचे? याबाबतचे सुरक्षा विषयक प्रक्षिशण दिले जाईल. सुरक्षित ठिकाणी आसरा कसा घ्यायचा याची एक प्रकारची तालिम असेल. केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन यांच्या अध्यक्षतेखाली काल एक उच्चस्तरीय बैठक झाली. त्या बैठकीत बुधवारी होणार्‍या नागरी संरक्षण सरावाचा आढावा त्यांनी घेतला. या वेळी वरिष्ठ नागरी आणि  पोलिस अधिकारी उपस्थित होते. 
 
दरम्यान, विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना नागरी संरक्षण सराव करण्याचे आदेश केंद्रीय गृहमंत्रालयाने दिले आहेत. त्यामध्ये विविध राज्यातील प्रशासन,  विद्यार्थी, शैक्षणिक संस्था, सरकारी आणि खासगी संस्था, रुग्णालयाचे कर्मचारी, रेल्वे आणि मेट्रोचे अधिकारी, पोलिस, अग्निशमन दल, निमलष्करी आणि संरक्षण दलेही सहभागी होत आहेत नागरी संरक्षण सरावासाठी संवेदनशील ठिकाणे ज्या जिल्ह्यांत आहेत तेच निवडण्यात आले आहेत. त्यामध्ये कँटोन्मेंट किंवा शुद्धीकरण प्रकल्प, आण्विक प्रकल्प आदींचा समावेश असेल. देशातील असे ३०० जिल्हे सरावासाठी निवडले आहेत.

Related Articles